सावरकर कुटुंबातील महिला संयमी, धीरोदत्त, राष्ट्रभक्त वीरांगनाच होत्या: प्रा. स्नेहल पाठक
उदगीर: ब्रिटिश सरकारकडून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व त्यांच्या बंधूंचा अनन्वित छळ होत असताना सावरकर कुटुंबातील महिलांनी डगमगून न जाता कुटुंबाला तर उभे करण्याचा प्रयत्न केलाच पण सावरकर बंधूंच्या राष्ट्रकार्यात हिरीरीने सहभाग नोंदवला. तिन्ही सावरकर बंधूंच्या पत्नी या खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेमी, देशभक्त वीरांगणाच होत्या असे मत प्रसिद्ध साहित्यिका स्नेहलता पाठक यांनी व्यक्त केले.
उदगीर येथील संस्कार भारती च्या वतीने लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्रांगणात प्रसिद्ध साहित्यिका प्रा. स्नेहलता पाठक सावरकरांच्या कुटुंबातील स्त्रियांचे योगदान या विषयावर यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्कार भारती उदगीर शाखेचे अध्यक्ष सतीश उस्तूरे होते. व्यासपीठावर भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे स्थानिक समितीचे कार्यवाह शंकरराव लासुणे होते.
पुढे बोलताना प्रा. पाठक यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे संपूर्ण कुटुंबच स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी होते. तिन्ही सावरकर बंधु हे प्रखर राष्ट्रभक्त होते असे सांगत, या बंधूंच्या स्वातंत्र्यांच्या लढाईत तिघांच्याही पत्नीनी मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत आपले पती पूर्णपणे सहभागी होत असताना आपल्या संसाराची कसलीही काळजी न करता स्वातंत्र्यवीरांच्या पत्नीसह त्यांचे बंधू गणेशराव व नारायणराव या दोघांच्याही पत्नीनी एकमेकींना साथ देत कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला असल्याचे पथक म्हणाल्या. पाठक म्हणाल्या की सावरकरांचे थोरले बंधू गणेशराव सावरकर व त्यांच्या पत्नी यशोदाबाईंनी वि. दा. सावरकर यांच्या शिक्षणासाठी मोठी मदत तर केलीच पण यशोदाबाईं सावरकरांच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठबळ देण्यासाठी अनेक उपक्रमात सहभागी झाल्या. विदेशी वस्तूवर बहिष्कार घालणे, युवतीचे संघटन करणे अशा कामातून त्यांनी राष्ट्रहितासाठी आपले आयुष्य वेचले असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशराव व विनायक सावरकर या बंधूंना जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर यशोदा बाई व यमुनाबाई या दोघीचीही अवस्था किती बिकट झाली असेल याचा अंदाज येनार नाही. या काळात ब्रिटिशांकडून अत्याचार होत असताना दोघीही आलेल्या परिस्थिती ला धिटाईने सामोरे गेल्या. अशा परिस्थितीत स्वातंत्रवीरांच्या पत्नीना माहेरी पाठवण्यात आले. त्यातच सावरकर यांचे लहान बंधू नारायणराव यांनाही ब्रिटिशांनी अटक करून शिक्षा दिली. त्यामुळे एकटी पडलेल्या यशोदाबाईनी धीरोदात्तपणे सामोरे जाऊन पोलिसांचा त्रास सहन करत राहिल्या. कसेबसे व्यथा वेदना उराशी घेऊन त्यांनी आपल्या उदरनिर्वाह भागविला. या काळात त्यांनी महिलांना एकत्र करून आत्मनिष्ठ युवती समाज संघटनेची स्थापना करून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमूनाबाई यांनीही विदेशी वस्तूवर बहिष्कार टाकून पतीच्या राष्ट्रीय कामात सहभाग तर घेतलाच पण त्यांनीही पतीच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देताना कुटुंबात समन्वय ठेवण्याचे काम केले आहे. संकट व संघर्ष सावरकर कुटुंबासमोर कायम उभे होते. पण अशा परिस्थितीत कुटुंबातील स्त्रियांनी संयम ठेवून कुटुंब सांभाळण्याचे काम केले. सावरकर यांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर यांच्या पत्नी शांताबाई या तर खऱ्या अर्थाने वीरांगणाच होत्या. पूर्ण सावरकर कुटुंब स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असल्याची जाणीव असूनही त्यांनी विवाह केला व स्वतः त्यांनीही या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्या. पतीचे दोन्ही बंधू तुरुंगात असताना त्यांच्या पत्नींना आधार देत त्यांची आईसारखी सेवा केली. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर उद्भवलेल्या प्रसंगात पतींवर हल्ला झाला. त्यांनतर आलेल्या संकटाला सामोरे जाऊन त्यांनी आपल्या मुलांना उभे करीत असताना राष्ट्रभक्तीने त्यांना प्रेरित करण्याचे काम केले असल्याचे यावेळी प्रा. स्नेहल पाठक म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक श्रीपाद सीमंतकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अश्विनी निवर्गी यांनी करून दिला. आभार संध्या पत्तेवार यांनी मानले. कार्यक्रमाला संस्कार भारतीचे पदाधिकारी, समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
0 Comments