भयावह वर्तमानात सामाजिक विषमतेचा गड सर करणारी 'हिरकणी' -- डॉ शीलाताई केजकर
उदगीर:कालबाह्य विचार,रुढी, परंपरेला छेद देत परिस्थितीतून शहाणपण शिकत आजच्या भयावह वर्तमानात स्वतःला सावरत कुटुंबा बरोबरच समाजाला देखील दिशा देणाऱ्या स्त्रीची यशस्वी कहाणी म्हणजे हिरकणी होय असे मत डॉ. शीलाताई केजकर यांनी व्यक्त केले.
मंगलाताई शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली चला कवितेच्या बनात या साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून अमर्याद ज्ञान मर्यादित वेळेत प्राप्तीसाठी नियमितपणे चालू असलेल्या 304 व्या वाचक संवादात प्रा.डॉ. शीलाताई केजकर यांनी प्रा. राजपाल पाटील लिखित हिरकणी
या साहित्यकृतीवर बोलताना पुढे म्हणाल्या की, नातेसंबंध नासवून टाकणार्या राजनीतीच्या नैराश्यातून पतीची आत्महत्या, त्यानंतर मनोरमा स्वतःला सावरत शेती करते, गावात बचत गटाच्या माध्यमातून सहकारी बँक व ग्रंथालय उभे करते. त्यामुळे तिला शासनाचा हिरकणी पुरस्कार मिळतो. पतीच्या निधनानंतर मिळालेले एक लक्ष व पुरस्काराचे 50 हजार त्यात स्वतःचे अकरा हजार घालून एक लाख 61 हजार रुपये शासनाला परत करते आणि आपण आत्मनिर्भर झाल्याचे सिद्ध करून दाखवते अशा अनेक प्रसंगाचे, घटनांचे चित्रण करत वेदनेच्या माथ्यावर पाय देऊन परिस्थितीला शरण न जाता त्यावर मात करून कुटुंब आणि समाजाला दिशा देणाऱ्या स्त्रीची यशस्वी कहाणी निश्चितच समाजाला मार्गदर्शक ठरणारी आहे. या संवादा वेळी कादंबरीचे लेखक राजपाल पाटील हे देखील उपस्थित होते.
या नंतर झालेल्या चर्चेत अर्चना पैके, नाट्य लेखक तुळशीदास बिरादार, मोहन नीडवंचे, मुरलीधर जाधव आदींसह अनेकांनी सहभाग नोंदवला. शेवटी अध्यक्षीय समारोप मंगलाताई शेट्ये यांनी केले.
शासकीय दूध डेअरीच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे संचलन अंतेश्वर चलवा यानी केले तर आभार ज्योतीताई डोळे यांनी मानले. संवादकांचा परिचय प्रा. राजपाल पाटील यांनी करून दिला. यशस्वीतेसाठी संयोजक अनंत कदम आनंद बिरादार व सुरेश वजनम आदींनी परिश्रम घेतले.


0 Comments